मुंबई : सहकार व पणन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अटल महापणन विकास अभियान यशोगाथेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १२ फेब्रुवारी २०१९ रोजी मंत्रालयात प्रकाशन करण्यात आले.
या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आरोग्य व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पदुम मंत्री महादेव जानकर, पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि मुख्य सचिव दिनेश कुमार जैन उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सहकारी संस्थांनी सुरू केलेल्या व्यवसायांची व बजावलेल्या कामगिरीच्या यशोगाथा या पुस्तिकेतून मांडण्यात आल्या आहेत.
या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था, खरेदी विक्री संघ आदी पाच हजार सहकारी संस्थांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासोबत सहकारी संस्था, पणन व्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न होत आहेत. ‘मेक इन इंडिया’ व ‘मेक इन महाराष्ट्र’च्या धर्तीवर गाव पातळीवर सहकार व पणन क्षेत्रात ‘मेक इन व्हिलेज’ राबविण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात सहकार क्षेत्रात रोजगार निर्मिती वाढणार आहे.
या अभियानाच्या अंतर्गत सुमारे दोन हजार विविध सहकारी संस्थांनी व्यवसाय सुरू केले आहेत. योगदानातून घडलेल्या यशोगाथांची माहिती नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. नाविन्यपूर्ण व्यवसाय व उपक्रमाची माहिती या पुस्तिकेतून देण्यात आली आहे.